‘आय लव्ह नगर’ व ‘साईद्रारका सेवा ट्रस्ट‘तर्फे नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार...
शेतकरी आणि कष्टकर्यांची मुले न्यायाधीशपदावर पाहून आनंद : आ. रोहित पवार.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः न्याय व्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. नवीन न्यायाधिशांनी न्यायाचा निवाडा जलद गतीने करून जनतेला न्याय देण्याचे काम करावे. न्यायदान करण्याची व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू आहे. त्यांनी खर्या अर्थाने सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. तेच काम आपणही करावे. ब्रिटिश काळापासून आजही काळेकोट घालून कामकाज केले जाते. तरी ही काळेकोट परिधान करण्याची परंपरा बदलावी. देशामध्ये न्यायाधिशांची संख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे पक्षकाराला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. यामधून पक्षकाराचे मनस्ताप व आर्थिक भुर्दंड होत असल्यामुळे कोर्ट आणि कचेर्यांमुळे देशाचे नुकसान होत आहे. चांगल्या प्रकारचे लॉ कॉलेज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेतकरी व कष्टकर्यांची मुले आज न्यायाधीश पदावर पाहून मनाला आनंद झाला. नोकरीबरोबरच आपण इतर व्यवसायातून जनतेची सेवा करू शकतो. कष्टातूनच स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मुला-मुलींच्या स्वप्नावर आई-वडिलांनी विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळेच ते खर्या अर्थान न्यायाधीश झाले, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.
बंधन लॉन येथे साईद्रारका सेवा ट्रस्ट व आय लव्ह नगर यांच्यावतीने नगर जिल्ह्यातील 12 नवनिर्वाचित न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. रोहित पवार, आय लव्ह नगरचे संस्थापक उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सार्डईद्रारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अँड. धनंजय जाधव, अमित मुथा, दत्ता गाडळकर, जयश्री विजय औटी, दिग्विजय आहेर, गणेश शिंदे, सीए किरण भंडारी, डॉ. अनिल आठरे, अँड. गणेश शीरसाठ, संदीप देसर्डा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आय लव्ह नगरच्या माध्यमातून नगरचे नाव उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही सुरू आहे. जिल्ह्यातील 12 विद्यार्थी न्यायाधीश झाले असून त्यांचा गौरव करणे आमचे कर्तव्य आहे. न्यायाधीशांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्याचा मान आम्हाला मिळाला, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. चांगल्या कामासाठी आम्ही नेहमीच पाठीशी उभे राहू, असे ते म्हणाले.
अॅड. धनंजय जाधव म्हणाले की, आपण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कौतूक केले पाहिजे. न्यायाधीशांचा सत्कार तर झालेच असतील परंतु त्यांना घडविणार्या आई-वडिलांचा सत्कार करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे. आरोपी कोणताही असो, पहिल्यांदा न्यायाधीशासमोर उभे रहावे लागते. अभ्यासाबरोबर अध्यात्मिकतेची जोड देणे गरजेचे आहे. या माध्यमातून समाजासमोर चांगले विचार समोर येतात. सामान्य माणसाचा या न्याय व्यवस्थेवर खूप मोठा विश्वास आहे. यासाठी नवनिर्वाचित न्यायाधीशांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे ते म्हणाले.
अॅड. गणेश शीरसाठ म्हणाले की, पुणे येथील बी.ई. आव्हाड क्लासेसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन न्यायाधीश घडविले. न्यायाधीशांच्या सत्कारामुळे नवीन होतकरु विद्यार्थी न्यायाधीशांच्या अभ्यासक्रमाकडे आकर्षित होतील. ध्येय, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर न्यायाधीश होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येते. यासाठी प्रत्येकाने इच्छाशक्ती व प्रामाणिक प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. यावेळी न्यायाधीश शैलेश सातभाई, प्रवीण सागडे, हर्षदा अदमाने, दीपाली भंडारी, गौरी औटी, प्राची पालवे, सतीश वाकचौरे, प्रतिक सबडे, अश्विनी काळे, विष्णू गिते, प्रियंका काजळे, मोमीन हनीफ आदी न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागूल व आभार प्रदर्शन मितेश शहा यांनी केले.
No comments:
Post a Comment