स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांच्या मनात ईर्षा निर्माण न होता आत्मविश्वास निर्माण व्हावा- मोहिनीराज गटणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 1, 2021

स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांच्या मनात ईर्षा निर्माण न होता आत्मविश्वास निर्माण व्हावा- मोहिनीराज गटणे

 स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांच्या मनात ईर्षा निर्माण न होता आत्मविश्वास निर्माण व्हावा- मोहिनीराज गटणे

कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक समारंभ संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 23 जानेवारी 2021 रोजी मानकन्हैय्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या वतीने  आयोजित कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ डॉ.श्री.प्रकाश कांकरिया  डॉ.सौ.सुधा कांकरिया ,सिने- नाट्य अभिनेते श्री.मोहिनीराज गटणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक अभिनेते श्री.शशिकांत नजान मराठी साहित्य परिषदेचे सचिव आणि रसिक ग्रुपचे अध्यक्ष श्री.जयंत येलूलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साईबन येथे दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी निसर्गाच्या सानिध्यात संपन्न झाले.डॉ.श्री.प्रकाश कांकरिया यांनी प्रास्तविक केले गेले 23 वर्ष सातत्याने कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेचे आयोजन हे बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने होत आहे. यातून लेखक कलाकार तंत्रज्ञ घडले हे या स्पर्धेचे यश आहे असे त्यांनी सांगितले आणि स्पर्धेच्या 23 वर्षाच्या प्रवासाची माहिती दिली. डॉ.सौ.सुधा कांकरिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्या म्हणाल्या की मराठी हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीला कांकरिया करंडक स्पर्धेने अनेक कलाकार दिले यापुढे जाऊन मालिका आणि चित्रपट क्षेत्रात काही कलाकार आपले योगदान देत आहे ही अभिमानाची बाब आहे.अभिनेते श्री.मोहिनीराज गटणे म्हणाले की कोणतीही स्पर्धा ही कलाकारांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी असायला हवी, स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांच्या मनात ईर्षा निर्माण होऊ नये यातून फक्त आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि हे आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेने केले आहे.पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांचे विश्व समजून घ्यावे आणि एकांकिका मध्ये फक्त बालकांचे विषय असावेत. मुलांचे शब्द उच्चार शुद्ध  असावेत या साठी प्रयत्न करावेत. श्री.शशिकांत नजान म्हणाले की नाट्य कला ही एक तपश्चर्या आहे . कोणतीही कला काही महिन्यात किंवा कोणत्या कार्यशाळेत शिकून भागत नाही त्यासाठी ध्येयवेडे असावे लागते,निरीक्षण अभ्यास,सराव आणि अनुभव यातून कलाकार प्रगल्भ होत जातो.पालकांनी मुलांना यांत्रिक करू नये, मुलांमधील कला नैसर्गिकरित्या फुलू द्यावी त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये.श्री.जयंत येलूलकर म्हणाले की सध्या इंटरनेटचे जग आहे आपण पण जिवंत कलेला असणारे महत्व कायम असणार आहे.आपल्या मुलाने गायक व्हावे,नृत्यात यश मिळवावे,प्रसिद्ध व्हावे असा हेतू ठेवून वाटचाल करण्यापेक्षा मुलांनी कलेत परिपूर्ण व्हावे यासाठीं प्रयत्न करावेत.अहमदनगरचे नाट्य सांस्कृतिक क्षेत्र अत्यंत प्रभावी असून कांकरिया परिवाराने या क्षेत्राला संजीवनी देण्याचे कार्य केले आहे.संपत्ती,प्रतिष्ठा अनेकांकडे असते पण दानत असावी लागते कांकरिया परिवाराने सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रासाठी दिलेले योगदान यामुळे अहमदनगरला नावलौकीक प्राप्त झाले आहे.
जेष्ठ नाट्यकर्मी स्व.सतीश भोपे आणि स्व बापूराव पंडित यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन  यंदाचा करंडक त्यांना समर्पित करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण अंबाजोगाई येथील प्रा. संपदा कुलकर्णी व औरंगाबाद येथील श्री लक्ष्मीकांत धोंड यांनी केले. डॉ.श्री.प्रकाश व डॉ.सौ.सुधा कांकरिया यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक बाल कलाकारांच्या हस्ते कापण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.स.मो.इनामदार यांनी केले तर  आभार श्री. सदाशिव मोहिते यांनी मानलेस्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.मोहिते, श्री उमाकांत जांभळे, श्री सुभाष बागुल, श्री दत्ता इंगळे, कु प्रिया सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment