शॉर्टसर्किटमुळे रेणुकाईवाडी येथील शेतकर्याचा सहा एकर ऊस जळून खाक
नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी ः पाथर्डी तालुक्यातील रेणुकाईवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी रेवननाथ वाबळे व भानुदास वाबळे यांच्या उसाच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे सहा एकर ऊसाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे वाबळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे देखिल त्याच दिवशी पाथर्डी तालुक्याच्या दौर्यावर असताना त्यांनी मिरी येथे महावितरणच्या अधिकार्यांसोबत व शेतकर्यांसोबत चर्चा केली.या बैठकीनंतर पीडित वाबळे कुटुंबीयांनी मंत्री तनपुरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर मंत्री तनपुरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महावितरणच्या संबंधित अधिकार्यांना सूचना करून घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकर्याच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश सर्वांसमक्ष दिले होते.परंतु घटना घडून सुमारे तीन दिवसांचा अवधी उलटून देखील आजतागायत संबंधित अधिकार्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंत्र्यांनी केलेल्या सुचनेकडे देखील अधिकारी दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच ताबडतोब वरिष्ठ कार्यालयाकडे माहिती पाठविण्यात आली आहे.विद्युत निरीक्षक कामाच्या व्यापामुळे अद्याप येऊ शकले नाहीत.परंतु लवकरच येऊन ते पंचनामा करतील.परंतु महावितरण कडून संबंधित शेतकर्यास पुरेपूर सहकार्य केले जाईल.
- हितेशकुमार ठाकूर(सहाय्यक अभियंता,महावितरण,मिरी कक्ष)
No comments:
Post a Comment