बालकांच्या हक्कांसाठी शासनावर सामूहिक सामाजिक दबाव हवा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बालविवाह लागले अथवा बालकांच्या हक्काचा कुठेही भंग झाला,तर त्याबाबत कोणत्याही शासकीय अधिकार्याची जबाबदारी निश्चित नाही. शासनावर सामूहिक सामाजिक दबाव आणून ही जबाबदारी निश्चित केली,तरच वंचित बालकांना भविष्य देता येईल,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे यांनी केले. अनामप्रेम आदी संस्था आयोजित 28व्या श्रमसंस्कार छावणी मध्ये बालहक्कांची सद्यस्थिती श्री.शिंदे यांनी मांडली. बाल विवाहाचा कायदा ,त्यातील ग्राम स्तरावरील जबाबदार्या आयोगात सदस्य म्हणून काम करीत असताना आलेले शासन यंत्रणेच्या असंवेदनशीलते चे अनेक अनुभव त्यांनी विशद केले.
पाणी फाउंडेशन चे नगर आणि नाशिक जिल्ह्याचे प्रमुख विक्रम फाटक यांनी समृद्ध गाव स्पर्धेची संकल्पना विशद केली.पाणी फाउंडेशन च्या कामामुळे महाराष्ट्राच्या दुष्काळी गावात झालेले आर्थिक सामाजिक बदल फाटक यांनी माडले.समृद्ध गाव स्पर्धेच्या परीक्षणात सर्व युवा शिबीरार्थी सहभागी होणार आहेत.
स्वतःचा स्वीकार आवश्यक तरुणाईचे मनोभाव
या सत्रात क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सौ.दीप्ती करंदीकर यांनी सांगितले की,तरुणाईने स्वतःचा आहे तसा स्वीकार करावा. समाजामध्ये आणि या जगात आपण आलो, त्याचा काही तरी हेतू असतोच. जे चांगले असते ते तरुणाईने ऐकले- वाचले पाहिजे. तारुण्याची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जावी,ह्यासाठी प्रयत्नशील रहा. स्वतःची दिनचर्या ठरवा. त्या प्रमाणेच दिवस व्यतीत करा. स्वतःच्या आवडी जपल्याने आयुष्य समृद्ध होईल.औदासीन्य येणार नाही. पालकांशी संवाद तुटल्याने निर्माण होणारी प्रश्न दीप्ती यांनी मांडले. मोबाईल चा वापर योग्य पद्धतीने केला नशीब,तर या व्यसनाचे होणारे परिणाम त्यांनी सांगितले.
मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर म्हणाले की, कुठल्याही व्यक्तीच्या भावना ,विचार आणि कृती ,यातून त्याचा मनोविकार समजतो. मुरलेला ,जुनाट मानसिक आजार बरा व्हायला बराच वेळ,अनेक वर्ष लागतात.त्यामुळे मानसिक आजाराची लक्षणे दिसली की , लगेच उपचार घेणे फार महत्त्वाचे आहे. तीव्र नैराश्य , हर्षवायू , सायकोसिस आदी तरुणाईत वाढत चाललेले आजारांविषयी आणि उपाययोजना यांबद्दल त्यांनी संवाद केला.परदेशात थोडी मानसिकता बिघडली की लगेच मानसोपचार तज्ञाकडे जातात. आपल्याकडे अशी मदत घेणे अपमानास्पद समजले जाते. आजाराचा स्वीकार करण्यास नकार ,हीच विनाशाची सुरुवात असते, असेही डॉ.करंदीकर म्हणाले.
दंगल आणि विद्वेष टाळा
शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या सामाजिक आशय मांडणार्या शाहिरीने मंत्रमुग्ध केले. माणुसकीची शाळा ,या आपल्या उपक्रमाबद्दल त्यांनी सांगितले की,माणूस आतून आणि इतरांपासून तुटत असल्याने प्रथम झोपडपट्टीत ही शाळा सुरू केली.त्यामुळे सामाजिक सद्भाव वाढतो आहे. दंगल आणि विद्वेष टाळण्याचे आवाहन त्यांनी तरुणाईला केले.
राज्यस्तरीय श्रम संस्कार छावणीत 16 जिल्ह्यातून 227 युवा कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तरुणाईला वाढते बालविवाह,मानसिक आरोग्य आणि समृद्ध गाव अभियान, या विषयी च्याकार्यप्रेरणा देण्यासाठी संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनापर्यंत चालणार्या या छावणीत सामूहिक श्रमदानातून हिम्मत ग्राम येथील शेती , गाईंचे गोठे यात श्रमदान करण्यात आले.
No comments:
Post a Comment