एमएसएमई ग्राहक अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक : आर जगनमोहन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचे घटक आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या घटकाला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी सहज व सोप्या पद्धतीने कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने विशेष मोहीम सुरू केली असल्याची माहीती बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई विभागाचे उपमहाव्यवस्थापक आर जगनमोहन यांनी दिली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अहमदनगर क्षेत्रीय कार्यालयाने विविध कर्ज योजनांची माहीती देण्यासाठी आयोजीत केलेल्या महा एमएसएमई मॅरेथॉन (एम थ्री) मोहीमेच्या शुभारंभप्रसंगी आर. जगनमोहन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया व सीपीसीचे मुख्य व्यवस्थापक ओमकार कुमार हे होते.
ते पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे प्रभावीत झालेली अर्थव्यवस्था आता नव्या जोमाने पुर्वपदावर येत आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे कुशल व अकुशल असे सर्वाधिक रोजगार निर्माण करतात त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या ग्राहकांना सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकेने विविध कर्ज योजना सुरु केल्या आहेत. ग्राहकांचा बँकेवर अतूट विश्वास असल्याने देशातील मोजक्या बँकामध्ये महाराष्ट्र बँकेची उत्तम प्रगती सुरू आहे.
यावेळी बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक राजीव कदम म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण सुरु आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मात्र ग्राहकांच्या भक्कम पाठबळावर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. ग्राहकाभिमुख सेवा देत असल्याने कोरोना काळातही क्षेत्रीय कार्यालयाचा व्यवसाय अग्रेसर आहे. ग्राहकांना बँकेचे सर्व प्रॉडक्टस माहीत व्हावेत यासाठी मेळावे व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अद्ययावत माहीती देण्याचे काम सुरू आहे.
बँकेच्या ग्राहकाभिमुख सेवा व कर्ज योजनांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहनही श्री कदम यांनी यावेळी केली.
यावेळी आयोजीत मेळाव्यात जिल्हयातील ग्राहकांना कर्ज मंजूरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील शाखाधिकारी व मान्यवर ग्राहक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment