जेऊर येथे गतिरोधक बसविण्यासाठी उपोषणाचा इशारा
गतिरोधकासाठी ग्रामसभेचा ठरावमहावितरण कंपनीचा चौक व बस स्थानक परिसरात वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्या बाबत जेऊर ग्रामसभेत ठरावदेखील झालेला आहे. ठरावाच्या प्रती संबंधित विभागाला पाठवून देखील त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात गतिरोधक बसविण्यासाठी उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे व ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटोळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या चौकात तसेच बसस्थानक परिसरात गतिरोधक बसविण्याबाबत राजेंद्र दारकुंडे व पाटोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. महावितरण कंपनीच्या चौकात व बसस्थानक परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. या परिसरात आजपर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले आहे. येथील अपघाताची मालिका सुरूच असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची गरज आहे. बस स्थानक परिसर तसेच महावितरण कंपनीच्या चौकात नेहमीच वर्दळ असते. महावितरण कंपनीच्या चौकात औरंगाबाद कडून येताना तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो त्यामुळे येथील अपघातांचे प्रमाण जास्त आहे. यापूर्वी संबंधितांशी पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथे गतिरोधक न बसविल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ 6 फेब्रुवारीस उपोषणाला बसण्याचा इशारा राजेंद्र दारकुंडे व मधुकर पाटोळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment