निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचे मनोमिलन : विजयी उमेदवारांनी केला पराभूतांचा सत्कार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः गावच्या विकासासाठी निवडून आले म्हणजे काम झाले असे न मानता विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांचा सत्कार करून आगामी काळात त्याचे सह गावाला विश्वासात घेऊन गाव विकासाचे काम करू असा निश्चय नांदगाव येथील नवनिर्वाचित सदस्यानी व्यक्त करत एक वेगळा मार्ग चोखाळला व रोकडोबाच्या मंदिरात ग्रामस्थासमोर आपण ज्याचा पराभव केला त्याचा फेटा बांधून सत्कार केला.
कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील निवडून आलेल्या नऊ दिवस सदस्याबरोबर एकत्रित चर्चा केली करत कर्जत येथील यशदाचे प्रवीण प्रशिक्षक आशिष बोरा यांनी ग्राम विकासाच्या संकल्पना विशद केल्या यावेळी सर्वांनीच याबाबत सहमती दर्शवित गावात विकास झाला पाहिजे हे मान्य केले यासाठी गावातील लोकांमध्ये एकता रहावी, निवडणुकीमुळे निर्माण झालेली कटुता कमी व्हावी यासाठी व गावात एकता राहण्यासाठी नांदगावच्या सदस्यांनी थेट आपल्या विषयात ज्यांना पराभूत व्हावे लागले त्याच्या मागेही जनमत आहे हे लक्षात घेऊन गावात आपल्या हाताने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सत्कार करण्याची संकल्पना मान्य केली. यानुसार आज दि 25 जाने रोजी सकाळी नांदगाव मध्ये हा एक अनोखा कार्यक्रम ग्रामदैवत रोकडोबा मंदिरात सम्पन्न झाला , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी अमोल जाधव हे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आशिष बोरा यांनी विकासाची संकल्पना विशद केली व गावाने विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त करताना गावात फक्त बांधकामे करणे म्हणजे विकास नाही तर गावात लोकसहभागी नियोजन करत गाव विकास आराखडा तयार करून काम करण्याची वाट दाखवली यावेळी रोहिणी गोरक्ष बागल यांनी सीमा भाऊसाहेब गायकवाड यांचा, भाऊसाहेब मारुती गुंड यांनी तात्या मारुती गुंजाळ यांचा, बाळासाहेब मानसिंग निंबाळकर यांनी गणेश दत्तात्रय निंबाळकर यांचा, आण्णा शहाजी बागल यांनी शांतीलाल प्रभाकर खराडे यांचा, लता संजय गायकवाड यांनी सीता अंबादास जगताप यांचा, सुरेखा लक्ष्मण जगताप यांनी संगीता अशोक वाळुंज याचा, विजय संपत शिंदे यांनी दादा महादेव गायकवाड यांचा, कविता घनश्याम नेटके यांनी सलमा नसीर सय्यद यांचा, सविता तात्या मांडगे यांनी सीमा भाऊसाहेब गायकवाड यांचा सत्कार यावेळी केला.
कर्जत शहरात स्वच्छतेच्या कामात अग्रेसर असणार्या विविध सामाजिक संघटनाचे कालिदास शिंदे, घनश्याम नाळे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासक असलेले विस्तार अधिकारी मिसाळ, रोटरीचे नितीन देशमुख, काकासाहेब काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, भाजपाचे जिल्हा परिषद प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड यांनी मनोगते व्यक्त करताना या अत्यंत सुखद कार्यक्रमाचे कौतुक करताना कर्जत मध्ये स्वच्छतेच्या कामात अनेक दिवस अनेक लोक एकत्र येऊन काम करू शकत असतील तर गावच्या विकासात आपण ही सर्वानी एकत्र आलेच पाहिजे. उच्च विचार ठेऊन या दोन्ही गटाच्या यशस्वी व अयशस्वी व्यक्तीनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचे व कार्यक्रमाचे सर्वानी कौतुक केले. तर गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी गावात वाद नसतील तर प्रशासन त्या गावाला अधिक मदत करते असे म्हणत कर्जत शहरातील स्वच्छता अभियाना पासून प्रेरणा घेऊन अनेक गावांत स्वच्छता अभियान सुरू झाले आहे मात्र नांदगाव या गावाने यात आघाडी घेत निवडणुकी मुळे मनात निर्माण झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी जो पुढाकार घेतला तो वाखाणण्यासारखा आहे असे म्हणत गावातील सर्वानी एक विचाराने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष निंबाळकर यांनी केले.
No comments:
Post a Comment