ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी वसिम राजे यांचे ठिय्या आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी वसिम राजे यांचे ठिय्या आंदोलन

 ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी वसिम राजे यांचे ठिय्या आंदोलन.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी


       तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसह बसस्थानक,बसस्थानकावरील प्रसाधनगृहाची त्वरीत स्वच्छता करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी पारनेर आगारव्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या,मिळणारे उत्पन्न याच्या आधारे प्राधान्यक्रम ठरवून, येत्या आठ दिवसांत विविध मार्गांवर फेऱ्या सुरू करण्यात येतील असे आश्र्वासन प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल कोतकर व स्थानकप्रमुख एस.एम.कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.बसस्थानकासह परिसराची व प्रसाधनगृहांची तातडीने सफाई करण्याचे आश्र्वासन यावेळी देण्यात आले.

             यावेळी आगार व्यवस्थापकांमार्फत विभाग नियंत्रकांना पाठवलेल्या निवेदनात वसिम राजे यांनी म्हटले आहे की, टाळेबंदी शिथील झाल्यानंतर माध्यमिक शाळा व महाविद्यालये नियमीत सुरू झाली आहेत.तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी पारनेरसह, सुपे,टाकळी ढोकेश्वर,भाळवणी, अळकुटी,निघोज येथील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाण्या,येण्यासाठी एसटीच्या सेवेचा वापर करतात.टाळेबंदीपूर्वी पारनेर आगारातून सुमारे ४हजार ५०० विद्यार्थ्यांना सवलतीच्या तर सुमारे २ हजार ५०० विद्यार्थीनींना मोफत पासचे वितरण करण्यात येत होते.एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने एसटी सेवेचा वापर करणारे विद्यार्थी सध्या शिक्षणापासून वंचित रहात आहेत.त्यांचे शेक्षणिक नुकसान होत आहे.ही परिस्थिती अशीच राहिली तर ग्रामिण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधे असणारी दरी अधिक रुंदावणार आहे.असे राजे यांनी म्हटले आहे.

              पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू आहेत.या फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र बसस्थानक, परिसर तसेच प्रसाधनगृहांची नियमीत सफाई,स्वच्छता होत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक असतानाही आगार व्यवस्थापनाकडून स्वच्छतेच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.बसस्थानकासह परिसराला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

             स्थानकप्रमुखांनी दिलेल्या अश्वासनाप्रमाणे ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या त्वरीत सुर झाल्या नाही,बसस्थानक व परिसराची नियमीत स्वच्छता झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वसिम राजे यांनी दिला.यावेळी सतिश म्हस्के,अविनाश औटी,निखिल बोरकर,अक्षय सुर्यवंशी,नजीर तांबोळी,रियाज राजे,सनी थोरात,संदिप नगरे उपस्थित होते


चौकट

          एस.टी.महामंडळाने बेस्ट प्रशासनाशी मुंबई येथील स्थानिक प्रवाशी वाहतुकीसाठी करार केला आहे.त्यामुळे पारनेर आगारातून २० गाड्या मुंबई येथे पाठवण्यात आल्या आहेत.या गाड्या पुन्हा पारनेर येथे आणल्याशिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत करणे अशक्य असल्याचे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.याबाबत विभागीय पातळीवर काय निर्णय घेतला जाणार यावर ग्रामीण भागातील फेऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment