दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात
नगरी दवंडी
अहमदनगर -महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरं जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर दोनच दिवस हिवाळी अधिवेशन बोलवण्यात आले आहे.प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी असेल. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकतात.
तत्पूर्वी काल झालेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत 'आणीबाणी'चा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळाला.नुकत्याच झालेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये आरोप - प्रत्यारोप झाले होते.राज्य सरकार गेल्या वर्षभरात कसं अपयशी ठरलं आहे याचा पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर पलटवार केला.त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले पाहायला मिळतील. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.दोन दिवसाच्या अधिवेशनात काय होणार आहे? मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधारी गोंधळ घालून चर्चा न करता विधेयकं मंजूर करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल लगावला होता.
No comments:
Post a Comment