शिर्डी-पुणे शटल सेवा सुरू करावी
जागरूक नागरिक मंचचे रेल्वेमंत्र्यांना निवेदननगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये शनिशिंगणापूर आणि शिर्डी या देवस्थानांमुळे दररोज प्रचंड भाविकांची संख्या येत जात असते, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा असुनही रस्त्यांच्याबाबत अविकसीत आहे. जिल्ह्यातून आणि शहरातून हजारो लोक कामासाठी पुण्याला जात येत असतात, त्यामुळे शिर्डी पुणे रेल्वे शटल सेवा सुरू करावी अशी मागणी जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचेकडे केली आहे. हे निवेदन व रेल्वेची प्रतिकृती स्टेशन प्रबंधक एन पी तोमर यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर पुणे रस्त्यावर वाढलेली प्रचंड ट्रॅफिक आणि रस्त्यामध्ये शिक्रापूर वाघोली या ठिकाणी होणारी प्रचंड ट्रॅफिक जाम हा विषय प्रचंड चर्चेचा आणि त्रासदायक ठरलेला आहे,नगर ते पुणे या अवघ्या 120 किलोमीटर आंतर आला चार-चार तास लागत आहेत, या पातळीवर रेल्वेने जर एक पाऊल प्रयोगिक तत्वावर टाकले, तर त्यातून क्रांती घडू शकते त्यासाठी सदरचे एक तांत्रिक आणि व्यावसायिक विश्लेषण आपल्याला देण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याचा सकारात्मक विचार करावा अशी कळकळीची विनंती आहे, रेल्वेच्या एक बोगी मध्ये साधारण 72 माणसे बसू शकतात, आपल्या गणितासाठी बसलेले व उभे राहिलेले किंवा डजस्टमेंट करून बसलेले, अशी माणसे शटलच्या बोगीच्या रचनेचा लोकल प्रमाणे अभ्यास केला असता, साधारणपणे 100 माणसे एका बोगी मध्ये प्रवास करू शकतात, कारण त्या लोकल टाईप बोगीमध्ये फक्त सीटिंग अरेंजमेंट असते, अशी जर 10 डब्याची शटल सुरू केली, तर कमीतकमी 1000 माणसे दररोज निश्चित प्रवास करतीलच, जर प्रतिमाणसी शिर्डी ते पुणे फक्त 150/ रुपये तिकीट ठेवले तर (जास्तही ठेऊ शकता) कमीतकमी 150000/ रुपये जायचे व 150000/रुपये यायचे असे दिवसाला 300000/ रुपये रेल्वेकडे जमा होतील म्हणजेच महिन्याला 90 लाख रुपये आणि वर्षाला साधारणपणे अकरा कोटी रुपये जमा होतील.
रेल्वेची कुठलीही नवीन गाडी सुरू करण्यापूर्वी व्यावसायिक दृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या विचार केला जातो, तांत्रिकदृष्ट्या असा विचार केला जातो की गाडी धावण्याच्या वेळेला तो पुर्ण ट्रॅक रिकामा आहे की नाही,व त्या मार्गावर किती प्रवासी दररोज असतात, आणि व्यावसायिक दृष्ट्या विचार केला जातो की त्या गाडीची एक फेरी करण्यासाठी जो खर्च येतो तो वजा जाता रेल्वेला त्यातून किती उत्पन्न मिळेल?
या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला असता कुठल्याही गाडीचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी इंधन, वीज, कर्मचारी, यांचे वेतन, गाडीचा घसारा, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्चाचा तपशील, एकत्रित केला असता रेल्वेला साधारणपणे प्रत्येक किलोमीटरला इतर अप्रत्यक्ष खर्च धरून ढोबळ मानाने दोनशे रुपये प्रति किलो मिटर (जर इंजिन विजेवर चालणारे असेल तर) खर्च येतो. या हिशेबाने शिर्डी ते पुणे हे अंतर अंदाजे 250 किलोमीटर आहे( रस्त्यांचे अंतर वेगळे असते) म्हणून 200ङ 250=50000/रु. आणि कर्मचार्यांचे वेतन गाडीचा घसारा व मेंटेनन्स या सर्वाचा विचार केला असता अजून50% म्हणजे 30000/ रुपये खर्च गृहीत धरला तर 80000/ रुपये जायला आणि 80000/ रुपये यायला असा खर्च रेल्वेला होऊ शकतो.
तर जाऊन येऊन तीन लाख रुपये जमा होत असल्यामुळे दररोज एक लाख 40 हजार रुपये इतका फायदा होऊ शकतो, अर्थात महिन्याला 40 लाख वर्षाला पाच कोटी रुपये निव्वळ एका शटल मूळे रेल्वे फायद्यात जाऊ शकते एवढेच नव्हे तर अहमदनगर हून पुण्याला ज्या रोज हजारो कार जात असतात व जाताना शिक्रापूर आणि वाघोली ला शिव्या देत लोक प्रवास करतात, त्या हजारो लोकांचा वेळ, पैसा, आणि पेट्रोल ही राष्ट्रीय राष्ट्रीय संपत्ती व प्रदूषण या सर्वांची बचत होईल, याचा तरी केंद्र सरकारने व प्रशासनाने विचार करून अशी शटल सेवा प्रायोगिक तत्त्वावर का होईना सुरू करून अहमदनगरचा अहिल्योध्दार करणारा एखादा उ:शाप द्यावा. अशी अपेक्षा आहे,कारण फ्लाय ओव्हर,मेट्रो असे शब्द नगरकर लोक स्वप्नात देखील उच्चारू शकत नाहीत.
याउपर जर येथील पुढार्या प्रमाणेच रेल्वे पण उदासीन असेल किंवा खर्च करायला तयार नसेल, तर नगरच्या कुठल्याही पुढार्याला मधे न घेता, कमिशनचा विषय टाळून प्रामाणिकपणे व्यावसायिक तत्त्वावर एखाद्या बड्या उद्योगपतीला प्रायोगिक तत्त्वावर अशी शटल सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी देऊन पाहावी,. नाहीतरी या ना त्या निमित्ताने खासगीकरणा कडे वाटचाल चालूच आहे, तर अशा सकारात्मक बाबींचा विचार करून खर्या अर्थाने विकास करावा, अशी समग्र नगर वासियां तर्फे नम्र विनंती आहे, यामुळे केवळ नगरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा फार मोठा फायदा होईल असे श्री मुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अमृत बोरा, जय मुनोत, प्रकाश भंडारे, दत्ता गायकवाड, प्रसाद कुकडे, कैलास दळवी, मकरंद घोडके आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment