राष्ट्रीय लोक न्यायालयास मोठा प्रतिसाद... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

राष्ट्रीय लोक न्यायालयास मोठा प्रतिसाद...

 राष्ट्रीय लोक न्यायालयास मोठा प्रतिसाद...

हजारो प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली, सुमारे एकोणीस कोटी रुपयांची वसुली!

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या संयुक्त विदयमाने जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोकन्यायालयास जिल्ह्यातून मोठा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन करत काळजी घेण्यात आली. तसेच गर्दी टाळण्यासाठी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात उद्घाटन समारंभाचे आयोजन न करता न्यायधीशांच्या नियोजन बैठकीत न्या. श्रीकांत आणेकर यांनी औचारिकपणे लोकन्यायालयाच्या कामास सुरवात केली.
   या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नगर जिल्हा न्यायालयात दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. अ‍ॅक्ट प्रकरणे, बँकांच्या कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्या खालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे,इलेक्ट्रीसिटी अ‍ॅक्टची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या आगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे आपसी समझोत्या करीता ठेवण्यात आले होते. यामध्ये एकूण 20,418 प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 2,773 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यावेळी 19,02,67,703 रुपये रक्कम वसुल करण्यात आली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर व न्यायाधीशांनी यांनी सर्व पॅनलला भेटी देवून कामकाजाचा आढावा घेतला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करा असे आवाहन करत होते.
   प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे म्हणाल्या, न्यायालयाचे कामकाज आता पूर्व पदावर आले आहे. दीर्घ काळानंतर लोकन्यायालय झाल्याने पक्षकर व वकिलांनी मोठा प्रतिसाद लोकन्यायालयास दिला आहे. सर्वांचे करोना पासून संरक्षणाची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे. कोर्ट हॉल मध्ये गर्दी होवू नये यासाठी वेगळ्या उपाययोजना राबवयात आल्या आहेत. सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग व पक्षकारांनी भरपूर सहकार्य केल्याने हे लोकन्यायालय यशस्वी झाले आहे.
   अ‍ॅड. भूषण ब-हाटे म्हणाले, करोनामुळे गेल्या 9 महिन्यांपासून कोर्टाचे काम जवळजवळ बंद होते. त्यामुळे बहुतांशी पक्षकरांची प्रकरणे मोठ्याप्रमाणात प्रलंबित होती. त्यामुळे या लोकन्यायालयास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सुरक्षितेची खबरदारी घेत याठिकाणी कामकाज झाले असून मोठ्यासंख्येने प्रकरणे सामुचाराने निकाली निघाली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांच्या सह सर्व कर्मचारी नवे असले तरी लोकन्यायालयाचे उत्कृष्ठ काम झाले आहे. अ‍ॅड. सुभाष काकडे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहेत. खूप जुने वाद याठिकाणी सामुचाराने मिटली असून दोन्ही बाजूचे पक्षकार गुण्यागोविंदाने परतत आहेत. त्यामुळे अत्यंत महत्वाचा वेळ व पैसा वाचला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या नेतृत्वाखाली फार चांगले आयोजन या लोकन्यायालाचे झाले आहे.जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व जिल्हा न्यायालयाच्या कार्माचारींनी लोकन्यायालयाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
   यावेळी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए. एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सतीश पाटील, सेन्ट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष काकडे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण ब-हाटे आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य वकील व कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड 19 रोगाचा प्रादुर्भाव असतांना देखील जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस मोठा प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment