ग्रामपंचायतीच्या निवडणूका गावपुढाऱ्यांसाठी अग्निपरीक्षा कार्यकर्त्यांकडून विचारपूस सुरू ; गावपुढार्यांची उडाली झोप
श्रीरामपूर - तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली असून येत्या १५ जानेवारीला त्यासाठी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही गावांमध्ये भाऊबंदकी तर काही गावांमध्ये हेवेदावे आडवे येत असल्याचे चित्र आहे. काहीही असले तरी ही निवडणूक गावपुढाऱ्यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत उद्या बुधवार दि. ३० रोजी संपत आहे. काहीही झाले तरी निवडणूक होणार असून तशा हालचालीला वेग आला आहे. आपले पॅनेल विजयी व्हावे म्हणून निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार शोधण्यासाठी धावपळ वाढली आहे. रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात गावपुढार्यांची रात्रीची झोपच उडालीआहे.
अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत हे प्रयत्न सुरूच राहणार आहेत, यात शंका नाही. गावातील वॉर्ड व त्या मधील मतदानाचा आकडा पाहता कोणता गट, कोणता चेहरा, कोणत्या वॉर्ड मध्ये प्रबळ आहे, त्यानुसार उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर गावातील गल्लीबोळात दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेले सरपंच पदाचे आरक्षण शासनाने रद्द ठरवून निवडणुकीनंतर नव्याने आरक्षण काढले जाणार असल्याने काहींच्या आशा पल्लवित तर काहींची धाकधूक वाढली आहे.
त्यासाठी अनेकांनी निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली आहे. अर्ज भरणे बाकी असताना भेटेन त्याला आपण उमेदवार आहे, एक मत मला द्या असे म्हणत इच्छुक आतापासूनच मताचा जोगवा मागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूकी नंतर अनेक राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्याचे चित्र रंगवत असतात. मात्र ग्रामीण भागातील ज्या गावात निवडणुका जाहीर झाल्या आहे, तिथला दौरा केला असता निवडणूक ही चांगली वागणूक, नाते, भाऊबंदकी यावर लढली जात असल्याचे दिसून येते. किंबहुना उमेदवार देताना त्याचे वाॅर्डात नाते, सबंध किती आहे, हे पाहूनच उमेदवारी दिली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणूक वरवर पाहणाऱ्यांना जरी सोपी वाटत असली तरी, ती इतर निवडणुकीपेक्षा अत्यंत किचकट आणि अवघड मानली जाते. जाणकारांच्या मते तालुक्यातील अनेक गावातील बारीकसारीक वाद, रुसवेफुगवे हे या निवडणुकीत अधोरेखित होत असतात. गावागावात ते खरे ठरतील.
No comments:
Post a Comment