वाळू उपसा केंद्रावर छापा 40 लाखांच्या बोटी नष्ट..
श्रीगोंदा तहसीलदारांची कार्यवाही..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा - जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हयात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे सक्त आदेश दिले असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्थानीक पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोस अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी काल पहाटे म्हसे शिवारात घोडनदी पात्रात अवैध वाळू उपसा करणार्यांवर करवाई करत 40 लाखाच्या चार बोटी नष्ट केल्या तर 1 ट्रकला बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दिसून आले मात्र तरीही बेलवंडी पोलिस सांगतात की अवैध वाळू उपसा बंद आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हसे, माळवाडी, खेडकर मळा, माठ , हिंगणी, राजापूर या भागात अनेक दिवसापासून स्थानीक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हयात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे दिलेल्या सक्त आदेशास केराची टोपली दाखविली असल्याचे दिसुन येते. कारण श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यानी जिल्हाधिकारी भोसलेंच्या आदेशानुसार काल रोजी पहाटे म्हसे शिवारातील घोडनदी पात्रात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करत सुमारे 40 लाखांच्या 4 बोटी जिलेटीन च्या साह्याने स्फोट करीत उध्वस्त केल्या तर दहा लाखाचा 1 ट्रक जप्त करून पुढील कारवाई करता पोलिसांच्या ताब्यात दिला.
या कारवाई नंतर तालुक्यातील गौण खनिज चोरणार्या चोरट्यांना तहसीलदार पवार यांच्या कारवाई विषयी माहिती मिळाली असून सकाळ सकाळी म्हसे गावात केलेल्या स्फोटाचा आवाज मात्र संपूर्ण तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणार्यांपर्यंत धोक्याची घंटा घेऊन पोहचला आहे. या कारवाईसाठी तहसीलदार पवार यानी स्थानीक महसूल प्रशासनाला अंधारात ठेऊन मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, भरत चौधरी आणि कामगार तलाठी पोटे, तसेच पवन मोरे, स्वप्नील होळकर यांची मदत घेतली.
No comments:
Post a Comment