दुमाला येथील उमेदवार रिंगणात विकासासाठी उभे राहणार की, सरपंच पदाच्या स्वप्नपूर्तीसाठी..?
नेवासा (जयकिसन वाघ) :- तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील ग्रामपंचायत ही नेवासा तालुक्यातील अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे तसेच हे गाव मिनी इंडिया म्हणून सुद्धा गाजलेला आहे . कारण येथे थोड्याफार प्रमाणात बहुजातीचे लोक वसलेले आहे. उस्थळ दुमाला येथे संभाव्य उमेदवारांचे खऱ्या अर्थाने कसरत चालू झाली आहे .उस्थळ दुमाला गावातील पुढारी कडून उमेदवाराची धरपकड सुरु आहे,अशी चर्चा आहे. मतदार राजांसमोर महत्वाचा प्रश्न असा की,गावाचा विकास किती करता येईल ! ह्यावर निवडणूक नवखे उमेदवार लडविणार की,सरपंच बनवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ! अशी चर्चा गावात मतदारांकडून सुरु आहे.
मात्र सरपंच कोण ? हे मात्र गुलदसत्यातच .! स्वच्छ प्रतिमा तसेच गावाच्या विकासाकरीता कार्य करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात सर्वच गटातील गावपुढारी भटकत आहे.सर्वांनाच सरपंच होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. गावाच्या विकासाचा विचार करून निवडणूक लढवावी असे कुणाच्याच तोंडून ऐकला मिळत नाही. उस्थळ दुमाला येथील निवडणूक स्व-विकास की ,गाव विकास ? येणारे काही दिवसात नक्की दिसणार अशी चर्चा गावकरी करत आहे. आता उस्थळ दुमाला येथे पॅनलवर खर्च कोण करणार स्वतः उमेदवार की त्यांचे ठेकेदार ? हे सुद्धा नवीन बाब यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे ? उस्थळ दुमाला येथील नेते हे दर पंचवार्षिक निवडणूक आली की, काका ,मामा,दादा,आण्णा म्हणण्यास सुरूवात करतात व नंतर ५ वर्षे तोंड़ दाखवित नाही व काही कामे सांगितले की, पाठ दाखवून जातात अशी जोरदार चर्चासत्र गावात होतांना दिसत आहे.म्हणूनच म्हणतात की,” उस्थळ दुमाला हे गाव राजकारणात अव्वल व विकासात मात्र खो…..अशी म्हण सर्वत्र आहे.”
उस्थळ दुमाला गावाची परिस्थिति सध्या संभ्रम अवस्थेत असल्याने कोणता उमेदवार निवडून आणायचे हेही मतदार राजाला नक्कीच ठाऊक आहे. मात्र उस्थळ दुमाला येथे विकास काय झाला व किती झाला यापेक्षा आपले ग्रामपंचायत मध्ये वर्चस्व कसे गाजवता येईल !
याकडे आजी माजी नेते समाज व जातीचे समीकरण जोडतांना दिसून येतांना दिसत आहे.विकास करणारा उमेदवार महत्वाचा की, वर्चस्व गाजविणारा उमेदवार ? अशी जोरदार टक्कर उस्थळ दुमाला गावच्या निवडणुकीत दिसणार आहे ,अशी चर्चा आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आता दिवसेंदिवस रंग भरू लागला आहे. उमेदवारी अर्ज भरायची मुदत आता केवळ एकच दिवस आहे. रणांगणात उतरण्यासाठी आणि इच्छुक बाह्या मागे सरुन तयार आहेत. काहीजण मैदानात दाखल झालेले आहेत. यापैकी अनेकांना वेध लागलेत ते सरपंच पदाचे... भलेही आरक्षण नंतर जाहीर होऊ दे, पण त्याची आगोदरच व्यहूरचना तयार करून ठेवली मी 'सरपंच होणारच'असे म्हणत काही जणांनी शड्डू ठोकला आहे. आरक्षण भले काही असू द्या, उपसरपंच पद का होईना, पण ते पदरात पाडून घ्यायचंच, असा चंग काही जणांनी बांधला आहे.
*प्रस्थापितांच्या प्रतिष्ठेचा कस लागणार*
नेवासा तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी युवावर्गाच्या पुढाकार वाढल्याने प्रस्थापितांच्या प्रतिष्ठेचा कस लागणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने गटातटाचे राजकारण व उमेदवारांची जुळवाजुळव करून नामांकन दाखल करणे सुरू झाले असले तरी प्रतिस्पर्धी गटाला तगडा उमेदवार मिळू नये यासाठी उमेदवार निवडीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
*पॅनल प्रमुखांची दमछाक*
निवडणुकीनंतरच सरपंच पदाचे आरक्षण सुटणार असल्याने निवडणुकीसाठी उभ्या
असलेल्या उमेदवारांचा खर्च कुठपर्यंत करायचा या विवंचनेत पॅनल प्रमुख सापडले असून निवडून आल्यानंतरही उमेदवाराने धोका देऊ नये या साठी चाचपून उमेदवार घेतले जात आहे
कारण निवडणुकीनंतर ही प्रत्यक्ष सरपंचपदासाठी मतदान होत नाही तोवर
सगळ्यांनाच या पॅनल प्रमुखांना सांभाळावे लागणार आहे.त्यामुळे भावी सरपंचाची चांगलीच दमछाक होत आहे.
*कसा जिंकून येतोय ते बघतोच..*
सध्या गावात उकाळ्या- पाकळ्यांना उत आला आहे. स्थानिक कार्यकर्ते इरेला पेटले आहेत. मला शेतातून वाट देत नाही. ऊस तोडणी आल्यावर रस्त्यावर पाणी सोडतोय. आता निवडणूक लढवतोय ना. लढवू देत, कसा 'तो जिंकून येतोय ते त्याला दाखवतोच'असाच जणूकाही अजितदादांचा सारखा आव आणत उड्डे काढण्यासाठीही काहीजण सरसावलेले दिसत आहेत. यातूनच काहीजण इर्षेला पेटले आहेत. रस्ता अडवणारा, ऊस तोड आल्यावर मतदान रस्त्यावर पाणी सोडणारा ज्या वार्डात उभा राहील त्याच वार्डात आपणही फार्म भरून त्याची अडवणूक करायची अजेंडा घेऊन काहीजण कामाला लागले आहेत.
*तहसील कार्यालयात गाव पुढाऱ्यांची गर्दी*
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गाव पुढाऱ्यांनी उमेदवारांना लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करायला अंतिम टप्प्यात आल्याने आपल्या उमेदवारांची कमी असलेली कागदपत्रे काढण्यासाठी गाव पुढारी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत.
यामुळे तहसील यंत्रणेवर ताण येत असून अगोदरच अपुरा कर्मचारी वर्ग त्यात ही गर्दी. उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र,ही सर्व कागदपत्रे तहसिल कार्यालयातच मिळत असल्याने नेवासा तहसील कार्यालयात तोबा गर्दी पहायला मिळत आहे. एक मात्र नक्की की निवडणुकीत काहीही झाले तरी शासनाला भरपूर कर गोळा होतांना दिसत आहे.
No comments:
Post a Comment