कोतवाली पोलिस निरीक्षकांनी घेतली अर्बन बँक घोटाळ्याची दखल...
फिर्याद द्या, प्रशासकांना पत्र!
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील 2 कोटी 50 लाख रुपयांच्या अपहर प्रकरणातील तक्रार अर्जाची दखल कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घेतलीय. गेली वर्षापासूनच चर्चित भ्रष्टाचाराची पोलखोल करणार्या बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे व्यवस्थापक सतीश बोरुडे, महादेव साळवे धर्माधिकारी मारुती औटी यांनी 11 सप्टेंबरच्या तक्रार अर्जाची दखल घेत मानगावकर यांनी अर्बन बँक प्रशासन सुभाषचंद मिश्रा यांना पत्र देवून फिर्याद देण्याची मागणी केली आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिश्रा यांनी फिर्याद दाखल केल्यास या प्रकरणाशी संबंधितांवर कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
बँकेची मुख्य शाखा व अन्य शाखांतील संशयास्पद व्यवहारातून अडीच कोटी रुपयांचा अपहार झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण बँकेकडून कोणी फिर्यादी होत नसल्याने हा गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कोतवालीच्या पोलिसांनी आता बँकेच्या प्रशासकांनाच पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवल्याने ते याला प्रतिसाद देतात की नाही, याचे कुतूहल व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी प्रशासक मिश्रा यांना 10 डिसेंबरला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्जदार यांनी कट रचून व संगनमताने बँकेत खोटी कागदपत्रे तयार करून अडीच कोटीचा अपहार केला व ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक केली आहे
तसेच प्रशासकांच्याच आदेशान्वये चौकशी अधिकारी अॅड. डी. व्ही. चंगेडे यांनी चौकशी करून 29 जून 2020 रोजी प्रशासकांना अहवाल दिला असून, त्याद्वारेही हा अपहार स्पष्ट होत आहे. दोन्ही तक्रारींची तपासणी केल्यावर त्यामध्ये प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत आपण (प्रशासक मिश्रा) वा आपण प्राधिकृत केलेल्या वरील चारजणांपैकी कोणीही कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, असे या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता बँकेचे प्रशासक या पत्राची दखल घेतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.
काय आहे हे अपहार प्रकरण :-
फेब्रुवारी 2019 च्या रिजर्व बँकेच्या तपासणी अहवालानुसार बँकेच्या तब्बल 1 कोटी 47 लाखाच्या रकमेचा हिशोब जुळत नाही व बँकेची ही मोठी रक्कम बँकेच्या मुख्य शाखेतून बँकेच्या मार्केट यार्ड शाखेला पाठविली, असे लिहिले होते, पण प्रत्यक्षात ही रक्कम मार्केट यार्ड शाखेला पोहचलीच नव्हती. मग ही रक्कम गेली कोणीकडे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रशासकांकडे तक्रार केली. प्रशासकांनी याबद्दल सखोल चौकशीची जबाबदारी बँकेतील एका वरिष्ठ अधिकार्यावर दिली व त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर हा 1 कोटी 47 लाखाचा अपहार झाल्याचा निष्कर्ष तर निघालाच, पण अशीच आणखी एक कोटी 03 लाखाची संशयास्पद नोंद सापडली व हा अपहार एकूण 2 कोटी 50 लाखाचा असल्याचा अहवाल प्रशासकांना सादर करण्यात आला. प्रशासकांनी यावर पुन्हा एक चौकशी अधिकारी नेमून या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. या चौकशी अधिकार्याने सर्व संबंधित कर्मचारी व अधिकार्यांचे जाबजबाब घेतले व अपहारासाठी जबाबदार असल्याबद्दलचा काही अधिकारी व कर्मचार्यांच्या नावांसह अहवाल प्रशासकांना दिला आहे.
No comments:
Post a Comment