स्टेट बँक ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करत आहे : महा प्रबंधक सुखविंदर कौर
ऋण समाधान योजनेची गोंडेगाव अंमलबजावणी
नगर – भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकरी महत्वाची भूमिका बजावत असून अर्थव्यवस्थेचा हिस्सा शेतकरी आहे. स्टेट बँकेने थकीत कर्जदारांना कर्ज मुक्त करण्यासाठी ऋण समाधान योजना आणली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात सुंदर व सुटसुटीत योजना स्टेट बँकेने आणली आहे. त्यामुळे या योजनेचा सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी लाभ घेवून कर्जमुक्त होवून इतरांना प्रेरित करावे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठीही बँक सहकार्य करीत आहे. भारतीय स्टेट बँक प्रतेक क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा स्टेट बँक पूर्ण करत आहे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या महा प्रबंधक सुखविंदर कौर यांनी केले.
भारतीय स्टेट बँकेच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने गोंडेगाव येथे आयोजित मेळाव्यात ऋण समाधान योजने अंतर्गत कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप व दहा महिला बचत गटांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या कर्जाच्या धनादेशाचे वाटप भारतीय स्टेट बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या महा प्रबंधक सुखविंदर कौर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्षेत्रिय कार्यालय व्यवस्थापक राजीव गुप्ता, मुंबईचे मुख्य प्रबंधक रजनिश वर्मा, ग्राहक सेवेचे मुख्य प्रबंधक महेंद्र मोहिते, व्यवस्थापक नवल अग्रवाल, मनोज शहा, पुणे प्रशासनिक कार्यालयाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर टाकळे श्रीरामपूर शाखा व्यवस्थापक बालाजी राव आदींसह स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. स्टेट बँकेच्या पुणे प्रशासनिक कार्यालयाच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत आत्मा मलिक संस्थेच्या कोकमठाम येथील मुलींच्या गुरुकुलच्या एस.बी.आय संगणक लॅब साठी ३४ अत्याधुनिक संगणक संच देण्यात आले आहेत. या लॅबचे लोकार्पण महा प्रबंधक सुखविंदर कौर यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलतांना राजीव गुप्ता म्हणाले, भारतीय स्टेट बँकेने थकीत कर्ज दारांना कर्ज मुक्त होण्याची ही मोठी सुवर्णसंधी दिली आहे. ३१ जानेवारी पर्यत थकीत कर्जाच्या व्याजात व मुद्दलीत सूट लाभार्थ्यांना मिळणार असल्याने ही संधी सोडू नका. कर्ज फेड करणाऱ्यांना बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार आहे. त्यामुळे आपल्या बरोबर आपले नातेवाईक, मित्र यांनाही या योजनेचा लाभ घेण्यास प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात महा प्रबंधक महेंद्र मोहिते यांनी स्टेट बँकेच्या ऋण समाधान योजनेची सविस्तर माहिती दिली. १०० % कर्ज मुक्त करणाऱ्या या योजनेत व्याजासह मुद्द्लीत सवलत मिळणार असल्याने त्वरित लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे सांगितले.
No comments:
Post a Comment