प्रवीण दरेकरांना ग्रामीण भागातील राजकारण काय माहीत ? निलेश लंकेचा टोला
ग्रा. बिनविरोध निवडणुका ही तर हजारे, पवारांची अपेक्षा - आ. लंके
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर - प्रवीण दरेकर यांना ग्रामीण भागातील राजकारण माहिती नाही. त्यामुळे ते तसे बोलतात. निवडणुकांमध्ये झालेले तंटे दहा वर्षही मिटत नाहीत. असे तंटे होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. निवडणुका टाळाव्यात, बिनविरोध सदस्य निवडले जावेत. सरपंचही बिनविरोध व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही अनेकदा व्यक्त केली. गावातील तंटे मिटावेत, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले आहे असं प्रतिउत्तर आ. लंके यांनी प्रवीण दरेकर यांना दिल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याची दिलेले प्रलोभन योग्य नाही, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी आणणार कोठून, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार लंके यांचेवर टीका केली होती. या टीकेला आ. लंके यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
मी घोषणा केल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना दरेकर मात्र विरोधात बोलत आहेत. त्यामुळे दरेकर यांनी निधीची चिंता करू नये. चांगल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पुरेसा निधी देतील, असे आमदार लंके यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे. त्यामुळे आता गावागावात ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
No comments:
Post a Comment