मतदारांना जागरूक करण्यासाठी रविवारी पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनाम्याचे आयोजन
मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रासह जिल्ह्यात ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरु झाली असताना, पंचायतराजचे पावित्र्य जपण्यासाठी व मतदारांना जागृक करण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पंचायतराज मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार आहे. रविवार दि.20 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी पैसा, दारु व जातीचा वापर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीला लागलेला हा कॅन्सर असून, या प्रवृत्तीमुळे गावांचा विकास झालेला नाही. राळेगणसिध्दी, हिवरेबाजार अशा मोजके गाव सोडले तर चुकीच्या राजकीय प्रवृत्तीमुळे अनेक गावांच्या विकासाचा बट्टयाबोळ झाला आहे. पैसा, दारु व जातीचा वापर करुन उमेदवार निवडून येतात व विकासाच्या निधीवर डल्ला मारतात.
मतकोंबाड सत्यबोधी सुर्यनामाच्या माध्यमातून नागरिकांना जागृक करण्याचे काम केले जाणार असून, योग्य उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मतंकोंबाड, मतंकुभकर्ण व जातमंडूक मतदार ओळखा व सर्वांना कळवण्याची घोषणा केली जाणार आहे. कॉन्टम फिजिक्स ऑब्झर्वर इफेक्टने सिध्द झाले आहे की, चुकीच्या प्रवृत्तीकडे लक्ष ठेवल्यास त्यांच्यात सकारात्मक बदल घडतो. समाजविघातक कृती करणार्यांकडे लक्ष दिल्यास बदनामी होण्याच्या भितीने चुकीच्या गोष्टी करण्यापासून ते परावृत्त होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या जनजागृती मोहिमेसाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले आदि संघटनेचे पदाधिकारी आग्रही आहेत.
No comments:
Post a Comment