अहमदभाई म्हणाले, “उद्धवजी चिंता मत करो” आणि सरकार स्थापन झाले!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेते अहमद पटेल यांना विधानसभेत श्रद्धांजली..
मुंबई : एकदा एका विचित्र राजकीय परिस्थितीत माझे बोलण अहमद भाई पटेलांशी झाले होते. त्यावेळी त्यांनी विश्वास दिला की उद्धवजी चिंता मत करो, त्यानंतर मात्र त्यांनी सांगितले तसेच झाले. महाविकास आघाडीच कसे जुळणार असे वाटत असताना, त्यांचा फोन आला आणि काम झाले, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितली. खर्या अर्थाने काँग्रेसमधील चाणक्य गेला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना काल विधानसभेत शोक प्रस्तावाच्या वेळी व्यक्त केल्या. सत्तेत आल्यापासून काही अनपेक्षित धक्के होते, त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे अचानक मृत्यू होणे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अहमदभाई पटेल यांचा सहवास अनेकांना लाभला. त्यांना एपी नावाने ओळखले जायचे. एपीच्या घरी जायचा योग अनेकांना आला. त्यांच्या निधनाच्या 8 दिवस आधी आमच्या दोघांची हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. त्यांना भेटायला गेल्यावर ते उठून बसले. आम्ही सुरक्षित अंतरावर बसून जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या. पण नियतीला काहीतरी वेगळच मान्य होते. त्यांची अवघ्या आठ दिवसात तब्येत खालावली आणि कोणालाही वाटलही नव्हते इतक्या अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, अशी आठवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यातल्या नेत्यांना सोनिया गांधी यांच्याकडे बोलावून घेतले. आम्हाला एपींचा निरोप आल्यानंतर आम्ही राज्यातले नेते दिल्लीला गेलो. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीला सखोल चर्चा झाली. अध्यक्षांचा आदेश मानून त्यांनी ते प्रामाणिकपणे राबवले. महाविकास आघाडीची मोट बांधण्याचे काम हाती घेतले आणि मार्गी लावले. पक्षातील व्यक्तिगत संबंध तर चांगले होतेच, पण इतर पक्षातही त्यांचे संबंध चांगले होते. रात्री अडीच तीन वाजेपर्यंत काम करायचे आणि जेवण रात्री 2 वाजता करायचे. कोणतीही सामाजिक संघटना असो प्रत्येक राज्यातील कार्यकर्त्यांची बारकाईने माहिती त्यांच्याकडे असायची. एकूणच राजनैतिक क्षेत्रातले त्यांचे योगदान मोठे होते, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
महाविकास आघाडी सरकारची सुत्रे सांभाळल्यानंतर कसं सुरू आहे हे विचारण्यासाठी अनेकदा अहमदभाई पटेल यांचा फोन यायचा. एकदा मी रात्री 11.30 वाजता घरी पोहचल्यावर फोन आला की, अहमदभाई पटेल यांचा फोन येऊन गेला आहे. रात्री 12.15 वाजता खूप हिंमत करून फोन केला, यावेळी जागे असतील का हा विचार करून फोन केल्यावर त्यांच्या मुलीने फोन उचलला आणि सांगितले की अहमदभाई आता झोपले आहेत. तुम्ही रात्री अडीच वाजता फोन करा, तेव्हा ते एका अपॉइंटमेंटसाठी उठणार आहेत. राजकारणात अशी माणसे ही शोधून सापडणार नाहीत, अशी आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेत सांगितली. माझ्याकडे अहमद पटेल यांच्यासोबतच्या काही जुन्या आठवणी नाहीत. खूप कमी वेळा माझी आणि त्यांची भेट झाली. काँग्रससोबत आमची अनेक वर्षे ही मतभेदात गेली. विरोधकांच्या डावपेचात जेव्हा नामोहरम व्हायचो तेव्हा अनेकदा यामागचा नेमका सूत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी केल्यानंतर अहमद पटेल यांचे नाव माहित व्हायचे. आम्ही शिवसेना म्हणून एक टोकाच्या विचारधारेचा पक्ष तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे आणखी एका वेगळ्या विचारधारेचे पक्ष. या दोन्ही विचार सरणींचे कधी जुळेल, कधी राजकीय नाते पुढे जाईल असे वाटत नसताना, आता कुठे गेल्या एका वर्षभरात जुळू लागले आहे. राजकारणात आपण अनेक गोष्टींसाठी प्रयत्न करतो, प्रत्येक गोष्टी होतात, असे होत नाही. पण अहमदभाईंना भेटल्यावर मात्र गोष्टी होतात हा दिलासा असायचा. पक्ष रूजवण मजबुत करणे यासारख्या गोष्टींसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. महाविकास आघाडी तयार होताना या आघाडीत सिंहाचा वाटा उचललेला मित्र आपल्यातून निघून गेला
काँग्रेस पक्षातल्या स्थित्यंतराची पडद्यामागची त्यांची भूमिका महत्वाची अशी होती. कष्ट करण्याची महत्वाची क्षमता हा त्यांचा गुण होता. कोणीही नेता झाला तर त्यांची पहिली मदत घ्यायचा. कधीही प्रकाश झोतात न येणारा, काँग्रेसचा ट्रबल शूटर म्हणून त्यांची ओळख होती. कोणाची समजूत काढायची हे त्यांच्याकडून शिकाव. कधी भेटायचे, कधी फोन करायचे, कोणालाच कळायचे नाही अशी आठवण राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली. अनेकदा पंतप्रधान आणि युएपीए अध्यक्षांमध्ये समन्वयाचे कामही त्यांनी केले. 2004 च्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्री बनण्याची संधी होती. पण त्यांनी संघटनेचेच काम करायचे ही भूमिका ठेवली. युपीएच्या 2004 नंतरच्या दहा वर्षाच्या काळात त्यांचे काम अतिशय महत्वाचे होते याचा मी साक्षीदार आहे. त्यांची काँग्रेसमधील जागा कुणीही भरून काढणार नाही, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment