सराफांना लुटणार्या गुन्हेगारांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई : पोलीस अधिक्षक मनोज पाटील
सराफ व्यावसायिकांच्या शिष्ठमंडळाचे एसपींना निवेदन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना लुटणार्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करावी, सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना स्वतःच्या व जवळ असलेल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वरचा शस्त्र परवाना त्वरित मिळावा, तसेच दरोडे टाकणार्या आरोपींकडून लवकरात लवकर मुद्देमालची रिकव्हरी करावी या मागण्यांचे निवेदन अहमदनगर जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हध्यक्ष संतोष वर्मा यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना सराफ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने दिले. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सराफांना लुटणार्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच शस्त्र परवाना मिळण्यासाठीही जिल्हाधीकारींकडे शिफारस करू असे आश्वासन दिले. पोलीस व सराफ यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण होवून गुन्ह्यांचा तपास लवकर लागावा यासाठी सर्व सराफ व्यावसायिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शहाणे, बाळासाहेब जिरेसाळ, सचिन दिक्षित, अतुल पंडित, सचिन कुलथे, राहुल पंडित, प्रशांत मुंडलिक, सुर्यकांत दिक्षित, राजू शेवाळे आदी उपस्थित होते.
सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या आठ महिन्यापासून कोरोना महामारी मुळे सर्व बाजारपेठा, जनमाणसांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. अशा भिषण परिस्थितीत बर्याच लोकांच्या नौकर्या गेल्या. आर्थिक परस्थिती विस्कळीत झाल्यामुळे जिल्ह्यात चोर्या, दरोडे, बॅग लिफ्टिंगच्या घटना तसेच सोनार व्यावसायिकांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
बर्याच प्रकरणात आरोपी पकडले गेल्यानंतर त्या आरोपींना जामीन होऊन ते पुन्हा वरील गंभीर गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून वरील गंभीर गुन्हे करणार्या आरोपींना मोक्का लावावा अशी आम्ही मागणी करतो. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. सराफ सुवर्णकार यांना लुटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बर्याच घटनांमध्ये सराफांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना आपल्या जिवाचे व मालमत्तेचे रक्षण करता यावे यासाठी रिव्हॉल्वरचे लायसन्स त्वरीत मिळावे अशी आपणास मागणी करतो.
सराफ सुवर्णकार बांधवांना लुटमार दरोडे टाकलेल्या प्रकरणात आरोपी पकडले जाऊन सुद्धा मुद्देमालच्या रिकव्हरीचे प्रमाण अतिशय कमी आहे. पंधरा दिवसापूर्वी मिरजगाव येथील सुवर्णकार श्री अतुल पंडित गंभीर मारहाण करून त्यांच्या जवळील सुमारे 800 ग्रॅम सोन्याचे दागिने व साडे सतरा किलो चांदीचे दागिने लुटून नेले होते. या प्रकरणात आरोपी पकडले गेले परंतु अद्याप फक्त दोनशे ग्रॅम सोने रिकव्हर झाले आहे. हे ताजे उदाहरण आहे. तरी सराफ सुवर्णकार व्यावसायिकांच्या मागण्यांकडे आपण स्वतः जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी केली.
No comments:
Post a Comment