राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो पण जास्त काळ शत्रूही नसतो ः आ. लंके
आमदार निलेश लंके यांचा गारगुंडी गावात भव्य सन्मान सोहळा संपन्न
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः राजकारणात कोणीही कोणाचा मित्र नसतो पण जास्त काळ शत्रूही नसतो असे सूचक विधान आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील पारनेर गावची नगरपंचायत निवडणुक व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व हा इशारा कोणाला दिला आहे किंवा याचा राजकीय अर्थ काय आहे याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे.
पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात आमदार निलेश लंके यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार निलेश लंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील शंकर फापाळे हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अशोकराव सावंत, उद्योजक सुरेश धुरपते, वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, कडूस गावचे सरपंच नाना मुंगसे, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईचे सचिव नितीन चिकने, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पिंपळगाव रोठा गावचे सरपंच अशोक घुले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा पूनम मुंगसे, सत्यम निमसे, दत्ता कोरडे, दत्तात्रय भांड, विजय सासवडे, संतोष सोनावळे, बाळासाहेब खिलारी, पोपटराव पायमोडे, ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष शिक्षक नेते बाबाजी फापाळे, गारगुंडी गावचे माजी सरपंच बी.डी.झावरे सर, अंकुश झावरे, सौ.हिराबाई झावरे, झुंबराबाई ठुबे, वि.का.से.सो.विद्यमान चेअरमन सोपान झावरे, व्हा.चेअरमन दिनकर फापाळे, एल.के.झावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब ठुबे, उपाध्यक्ष दिपक खोसे, निवृत्ती झावरे, अनिल कोरडे, हेमंत झावरे, अक्षय झावरे, रोहित झावरे, त्र्यंबकराव झावरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार निलेश लंके पुढे बोलताना म्हणाले की, राजकारण हे बदलते असते पण त्याचा परिणाम दूरगामी होतो म्हणून येणार्या ग्रामपंचात निवडणुकांमध्ये गावागावांत वादविवाद थांबवून सर्वांनी एकत्र बसून गावच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा असे आमदार लंके म्हणाले. बिनविरोध निवडणुका झाल्या तर गावचा विकास वेगाने होईल व गावं आदर्श होण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या गावात नवीन बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू करावी असे आवाहन अमादार निलेश लंके यांनी केले.
गारगुंडी गावचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. माझ्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज याच गावचे अपंग व्यक्ती त्र्यंबक झावरे यांनी भरला आहे. मला या गावाने गेल्या 20 वर्षांपासून विशेष प्रेम दिले आहे. आता मला या गावाला काहीतरी द्यायचे आहे म्हणून मी आज आलो आहे असे आमदार लंके यावेळी म्हणाले. तसेच भविष्यात गारगुंडी गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा असाही सल्ला दिला. राजकारणात कोणीही कोणाचा जास्त काळ मित्र नसतो व शत्रूही नसतो असेही सूचक विधान केले.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून भाऊबीजेच्या मुहूर्तावर पारनेर तालुक्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्यालय उघडणार असल्याचे सांगितले.
गावाला जोडणार्या रस्त्यांविषयी बोलताना टप्प्याटप्प्याने हे सर्व रस्ते आपण करू असे सांगितले. तसेच पालकमंत्री पाणंद रस्त्यांविषयी गावाने ग्रामपंचायत ठराव द्या आपण ते रस्ते करून देऊ असे सांगितले. गारगुंडी गावातील युवकांसाठी लवकरात लवकर आपण व्यायामशाळा मंजूर करून देऊ असेही आश्वासन आमदार लंके यांनी दिले.
सरपंच राहुल झावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गारगुंडी गावात आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून विकासकामांची गंगा वाहायची असेल तर गावाची येणारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन केले. तसेच या गावातील म्हणूनच मी स्वतः आमदार साहेबांनी आदेश दिला तर बिनविरोध निवडणूकीची जबाबदारी घेईल असे सांगितले. तसेच भविष्यकाळात नेत्रदीपक काम करून गारगुंडी गाव नक्कीच देशात नाव मोठे करील असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा पूनम मुंगसे म्हणाल्या की, आमदार निलेश लंके यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उभे राहिले पाहिजे व आपल्या गावांतील विकासकामे करून घेतली पाहिजे असे सांगितले. तसेच आमदार साहेबांनी तालुक्यातील जनतेसाठी केलेल्या कामांचा उल्लेख मुंगसे यांनी केला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुनील फापाळे यांनी आमदार निलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पारनेर तालुका हा आता लंके साहेबांच्या नावाने ओळखला जात आहे असे सांगितले. तसेच आमदार लंके यांना मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आमले यांनी केले, प्रास्ताविक बाबाजी फापाळे यांनी केले तर आभार माजी सरपंच अंकुश झावरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment