जिओच्या नेटवर्कमुळे ग्राहक त्रस्त, कंपनीकडून होतेय लाखोंची लूट
पाथर्डी तालुक्यातील मिरी व परिसरातील परिस्थिति
नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी ः कोरोनामुळे अनेक खाजगी आयटी कंपन्या आपल्या कर्मचार्यांना घरून कामे करण्यास सांगत आहे.तर अनेक शाळा व महाविद्यालयांनी देखील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे.त्यामुळे इंटरनेटचे वापरकर्ते ग्रामीण भागात वाढले आहेत. त्यामुळे अनेक जण इंटरनेटचा वापर करताना अडचण येऊ नये यासाठी सुमारे पन्नास रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंतचा इंटरनेट प्लॅन सुरू करत आहेत.मात्र कालावधी समाप्त होताच ग्राहकांना अतिरिक्त वेळ दिला जात नाही.दुसरीकडे याच कंपन्या ग्राहकांना नेटवर्कची सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहेत.यामध्ये रिलायन्स जिओ कंपनीने त्रस्त झालेल्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात पुरेसे नेटवर्क उपलब्ध व्हावे यासाठी उभारण्यात आलेले जिओ कंपनीचे टॉवर फक्त शोभेचे मनोरे आहेत की काय अशी शंका निर्माण होत आहे.कारण टॉवरच्या परिसरातील अनेकांना पुरेसे नेटवर्क मिळत नाही.नेटवर्क मिळाले तर इंटरनेटला पुरेसा वेग मिळत नाही आणि संतापजनक बाब म्हणजे पुरेशा क्षमतेचे जनरेटर उपलब्ध नसल्याने वीज बंद झाल्यावर टॉवर देखील काही वेळातच बंद पडते.त्यामुळे जोपर्यंत वीज नाही तोपर्यंत इंटरनेट व कॉलिंगची सुविधा देखील बंदच राहते.यामुळे ग्राहकांना नाहकच मनःस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे जिओचे सिमकार्ड म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पाथर्डी तालुक्यातील मिरी व परिसरातील जिओच्या ग्राहकांना सुमारे सहा महिन्यापासून नेटवर्कच्या अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बाबतीत संबंधित कर्मचारी व अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तर अनेक नोकरदार कर्मचार्यांचे देखील कामे खोळंबल्याने कर्मचार्यांना कंपनीकडून पगार कपातीचे संकेत देण्यात येत आहेत.
या विषयी युवकांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता अनेकांनी जिओच्या विरोधात संताप व्यक्त केला असून मिरीसह अनेक ठिकाणी जिओचा असा प्रॉब्लेम येत असल्याचे अनेकांनी पुढारीशी बोलताना सांगितले आहे.तर काहींनी या त्रासाला कंटाळून आपल्या सिमकार्डची कंपनीच बदलली आहे.त्यामुळे जिओने लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा सर्व युवक मिळून संबंधित विभागाकडे रीतसर तक्रार करून झालेल्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईची कायदेशीर मागणी करणार आहेत.तसेच सुधारणा न झाल्यास कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील काही युवकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment